Friday, May 29, 2020

भ्रमंती - अंदमान सफर

अंदमान सफर - एक समृद्ध अनुभव.

२/३ वर्षांच्या विश्रांती नंतर आम्हां मित्र मंडळींच्या या वर्षी  फिरायला कुठे जावं या चर्चेत अंदमान वर एकमतानं शिक्कामोर्तब झालं. प्रवासाची  तिकीटस्, हॉटेल बुकिंग्ज वगैरे  प्राथमिक फेरीचे सोपस्कार पूर्ण झाले आणि आम्ही थोडे निश्चिंत झालो. माझ्या मनात पर्यटनाच्या आनंदा बरोबरच  अंदमानचा नितांतसुंदर  निसर्ग , स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीचं दर्शन, या बेटांचा आपल्या पासून भौगोलिक आणि शासकीय दृष्ट्या असलेला दूरस्थपणा , तांत्रिकदृष्ट्या सुधारणांचा अभाव, त्सुनामीचे दूरगामी परिणाम अशा अनेक उत्सुकतांच्या संमिश्र भावना दाटल्या होत्या.  अजून एक  आकर्षण होतं ते म्हणजे राजधानीचं शहर असलेलं पोर्ट ब्लेअर बंदर !     या बंदराचं भारताच्या  सामान्य जीवनाशी असलेल्या तुटलेपणा विषयी वाचून होते. आणि म्हणूनच ते पहाण्याची मनात खूप उत्सुकता होती.

अंदमानचं बोलीभाषेतलं स्थानिक रुढ नाव अंडमान आहे. अंदमान हा एक द्विपसमूह आहे. भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून अंदमानचे पालकत्व भारताकडे आहे. पण भौगोलिकदृष्ट्या हे बेट भारताच्या सीमेपासून खूप दूर आहे. इतके की तिथल्या आणि आपल्या सूर्योदय - सुर्यास्ताच्या वेळेतही खूप फरक आहे. सकाळी ५/५:३० ला चांगलं उजाडलेलं असतं व संध्याकाळी ५:१५/५:२० ला सूर्यास्त  झाला की ५:३० ला सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलेलं असतं. त्यामुळे हॉटेल मधली खाद्यसंस्कृती ९:३० ला च बंद होते. इथली माणसं निसर्गाच्या कलाकलानी जगणारी, त्याचे नियम पाळणारी आहेत. निसर्गाला  नमवणारी नाहीत.  एकूणच जनजीवनाचा वेग स्वभावत:च मंद आहे. त्या वेगाशी आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. इथे ऐहिक श्रीमंतीच्या तुलनेत निसर्गाची अमाप श्रीमंती आहे. लौकिक दृष्टीने श्रीमंत कुटुंबसमूहातील एखादे कुटुंब आचार विचार आणि मूल्यांची जपणूक करणारं परंतू  तुलनेनं कमी श्रीमंत असेल तर त्यांचा बाणेदारपणा जसा चारचौघांमध्ये  उठून दिसतो  त्याचा मला इथे भास जाणवला. आमच्या गाईडने पहिल्याच दिवशी सांगितलं की इथे गरीबी असली तरी सर्व लोकं कष्ट करून खातात, इथे एकही भिकारी दिसणार नाही. आणि खरोखरच आमच्या मुक्कामात आम्हाला एकही भिकारी दिसला नाही. थर्मास मधून हिंडून  चहा/ कॉफी विकणं , फळं विकणं ही कामं आणि अशी अनेक कामं  पुरुषांच्या बरोबरीने बायकाही करताना दिसत होत्या.   एकदा एका बेटावरील  रिसॉर्टमध्ये एका मुलाला मी , इथे  इंटरनेट सेवाच  नाही तर तुम्ही कसे काय व्यवहार करता बुवा ? असं भाबडेपणाने  विचारल्यावर " अच्छा है नं, इधर का नेचर, पौधे , पंछी, जानवर  सब अच्छे रहते है. इंटरनेट टॉवर की वजह से नेचर और सब पर गंदा असर होता है न , हमे आदत हो गयी है " अशी एक बाणेदार चपराक मला त्या रिसॉर्टच्या मुलाने दिली. मी अवाक झाले. हाच तो स्वाभिमानाचा भास !

अंदमान ला जाताना प्रत्येक भारतीयाची पहिली ओढ ही सावरकर स्मारक पहाण्याची असते. पोर्ट ब्लेअरलाच हे राष्ट्रीय स्मारक आहे. राष्ट्रीय स्मारकाच्या तुलनेत पर्यटकांच्या दृष्टीने व्यवस्थापन व  स्वयंस्पष्टतेचा थोडा अभाव जाणवला. सावरकरांच्या कोठडीत बाहेर भाऊगर्दी असतानाही दोन घटका निवांत बसता आलं, " ने मजसी ने " या गीताने आदरांजली वाहता आली याचं आत्मिक समाधान आम्हां सर्वांना नक्कीच आहे. बाकी स्मारक छान आहे.  पर्यटकांचं दुसरं आकर्षण म्हणजे इथला निसर्ग अर्थात वेगवेगळे समुद्र किनारे. तिथलं सुरक्षाव्यवस्थापन मात्र वाखाणण्या सारखं आहे. प्रत्येक किनाऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाण्यात जाणारे पर्यटक, बोटचालक , हवामानात होणारे तात्कालिक बदल यावर त्यांची बारीक नजर असते  व त्याबाबत माईकवरून सतत सूचना ही दिल्या जातात. अंदमानला पर्यटक खास करून हॅवलॉक , रॉस व नील आयलंडस् ना भेट देतात. रॉस आयलंड वर मुक्तपणे विहरणारे  प्राणी, पक्षी आणि त्यांच्याशी आणि आपल्याशी ही  संवाद करणाऱ्या अनुराधा ताई हा अतिशय सुंदर अनुभव आहे.सर्वदूर दिसणारी  हिरवीगार वनश्री आणि निळाशार समुद्र मन मोहून टाकतो. बऱ्याचशा रिसॉर्टमध्ये खाजगी किनाऱ्याचीही  सोय असते. त्यामुळे निळ्याशार अथांग जलाशयासमोर बसून आपापल्या आवडीप्रमाणे वेळ घालवण्याचा आनंद घेता येतो. 

इथल्या सेवा सर्वसाधारणपणे महाग आहेत. कारण इथल्या व्यावसायिकांना सर्व गोष्टींसाठी कलकत्ता , मद्रास , विशाखापट्टणम या शहरांवर अवलंबून रहावे लागते. सर्वसाधारणपणे खाद्यसंस्कृती थोडी बेतानेच दिसली. ताजे पदार्थ बनवून देण्याच्या हातगाड्या ही पद्धत फारशी दिसली नाही. नारियल पानी, फ्रूट डिश , क्वचित कुठे भेळ वगैरे आणि चहा/ कॉफी ती देखिल थर्मास मधे .... मिळते. गरमागरम भजी / समोसे / अमृततुल्य वगैरे सर्व  फक्त बीच परिसरात दिसून आलं. एकूण जनजीवन शांत, सुशेगाद वाटलं. इथे प्रगत तंत्रज्ञानाचा वेग मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी आहे. सरकारी इमारतींवर  " शासकीय " ऐवजी 
" राजकीय " असा उल्लेख बघून मजा वाटली. काही बीच व आयलंडस् वर त्सुनामीच्या खुणा बघून मन गलबलून जातं.

 मूळ प्रवाहापासून तुटलेपण म्हणजे काय आणि त्यात स्वत:ला निभावणं म्हणजे काय , ही क्रांतीवीरांची भावना समजून घ्यायची असेल तर ऐहिक सुखाच्या मागे धावणाऱ्या आणि नविन तंत्रज्ञानाच्या वेगात होसपटणाऱ्या आपल्या सारख्या  जीवांनी अंदमानची सफर एकदा तरी  करावीच ! 

उत्सुकतांची सगळी गाठोडी मोकळी झाली होती . तिथल्या वातावरणातली शांत निळाई आणि  निसर्गसमृद्ध अनुभव घेऊन आम्ही सारे तृप्त मनाने  परतलो.


©️ ॲड.स्वाती लेले
अलिबाग - रायगड



  



Tuesday, May 12, 2020

देवाज्ञा...कैवल्याचे चांदणे

कैवल्याचे चांदणे .....

२२ ऑगस्ट २०१८ ला माझ्या सासूबाईंना देवाज्ञा झाली . गेले काही महिने त्यांच्या भोवती सुरु असलेला दिनक्रम अचानक थांबला आणि आठवणींचं मोहोळ उठलं . १९८१ साली लग्न होऊन मी या घरात आले . तेव्हापासून आज ३७ वर्षांचा माझा त्यांच्या बरोबर सहवास झाला . त्यांच्या विषयीच्या मनातल्या  भावना / आठवणी या लेखातून व्यक्त करणे एवढाच या लेखाचा प्रांजळ हेतू आहे  . 

पूर्वाश्रमीच्या सुधा भिकाजी भिडे लग्नानंतर सुमती पद्माकर लेले झाल्या. भिडे घराणं मुंबईचं तर लेले घराणं अलिबागचं ! मुंबई महानगरी तर तुलनेने अलिबाग निमशहर !   दोन्ही शहरांचा  प्रादेशिक आब सोडला तर  लौकिक धन, विचारधन, बुध्दीमत्ता या सर्वच दृष्टीने दोन्हीही घराणी समसमान ! लग्नापूर्वी इंटर आर्टस पर्यंतचं  कॉलेजच शिक्षण त्यांच विल्सन कॉलेजला  झालं . अलिबागच्या घरात पुढील शिक्षण पूर्ण करायला मुभा होती किंबहुना त्यांच्या सासऱ्यांची तशी इच्छाच होती. नंतर रुइया कॉलेज मधून त्यांनी बी . ए .केलं . बी .ए . झाल्यावर अलिबागला को. ए .सो. च्या शाळेत नोकरी सुरु झाली. . यथावकाश त्यांनी मुंबई  एस .एन .डि .टी . मधून बी .एड . व पुणे विद्यापीठातून एम .एड . केलं . साधारण २५ वर्ष शिक्षणसेवा केली. या काळात त्यांनी थळ व खंडाळा येथील शाळांमध्ये  मुख्याध्यापकपदाची धुरा सांभाळली. त्यांचा आवाज चांगला होता व लग्नापूर्वी त्यांच्या गाण्याच्या थोड्या परीक्षाही झाल्या होत्या . गाण्याचं पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सासूबाईंनी पाठिंबा दिला आणि त्यांच संगीत विशारद पूर्ण झालं . या कामी सुरुवातीचं संगीत शिक्षण नव्याने सुरु करताना त्याना अलिबागच्या वाखारकर बाई व उकिडवे बाई यांनी खूप सहकार्य केलं अस त्या आवर्जून सांगत .सुप्रसिद्ध गायिका सरला भिडे , मुक्ता भिडे या त्यांच्या चुलत बहिणी तर माणिक भिडे चुलत वहिनी  व विदुषी आश्विनी भिडे देशपांडे त्यांची भाची ! अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे शास्त्रीय संगीताचे रितसर  क्लास त्यांनी अलिबागमधे सुरु करुन हाच संगीताचा वारसा पुढे चालू ठेवला . जवळजवळ ३०/३५ वर्ष त्यांनी क्लास चालवले .त्यांचे अनेक  विद्यार्थी संगीत क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत . अलिबागला श्वेता कारभारी या त्यांच्या क्लासच्या आता उत्तराधिकारी म्हणून चांगली धुरा सांभाळत आहेत .
अलिबागच्या वीणा भजनी मंडळात त्यांनी हार्मोनियमची साथ अनेक वर्ष केली . क्वचितप्रसंगी त्या तबल्याची साथही करत असत. मंडळात त्या अनेक पदं म्हणत . मला स्वत:ला त्यांचं " वृंदावनी वेणू वाजे  " खूप आवडायचं . त्यांना दिलरुबाही वाजवता येत असे . आमच्याकडे एक दिलरुबाही  होता .दत्त मंदिर देवस्थानच्या त्या १२/१३ वर्ष अध्यक्ष होत्या. त्यांच्या कालावधीतच देवळाचा जीर्णोद्धार झाला .शाळा , क्लास , भजनी मंडळ या सर्वच ठिकाणी त्या लेलेबाई म्हणूनच ओळखल्या जायच्या. माझे सासरे सुद्धा त्यांना " लेलेबाई "नावानेच हाक मारत ! नातवंडां मुळे मात्र  आम्हां कुटुंबियांमध्ये त्या सर्वांसाठी  "आबी "  होत्या .

स्वभाव मुळातच शांत ! क्लास किंवा शाळे मधले विद्यार्थी असोत किंवा भजनी मंडळातील भगिनी असो चुकलेली गोष्ट समजावून सांगण्याकडेच कल असायचा. शाळेत इंग्लिश ,गणित , भूगोल , संगीत हे त्यांचे खास विषय असत . त्यातही गणितावर विशेष प्रभूत्व होतं . 

निसर्गत:च त्यांची प्रकृती राजस !  त्यामुळे तामसी खाणं त्यांना विशेष रुचत नसे .  दुधी , पडवळ , भोपळा, गवार ,ताकातली पालकाची भाजी या भाज्या, सर्व कोशिंबीरी  विशेष आवडायच्या . दुधीच्या भाजीला त्या सुकुमार भाजी म्हणायच्या .सर्व प्रकारची फळं ,सुकामेवा आवडत असे .दही आणि दह्याचे पदार्थ हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय ! पाककृतींमध्ये दुधी हलवा , सुरळीची वडी , दही वडा , मोदक ,कणसाची मसालाभाजी सुंदर करत असत .

लांब घनदाट केसांची निसर्गदत्त देणगी त्यांना लाभली होती. शाळेतल्या नोकरीच्या काळात त्या इंग्रजी 8 आकाराचा अंबाडा घालत असत . पण अलिकडे काही वर्षं  पांढऱ्या केसांची लांबसडक वेणी ही  व्यकिमत्वाची खास ओळख म्हणता येईल. केसांच्या निगराणीसाठी कायम शुध्द खोबरेल तेलाचाच वापर केला .

आमच्या अंगणात पूर्वी सकाळी पुरुष व संध्याकाळी महिला असा रितसर बॅडमिंटन क्लब चालत असे . भगिनीवर्गात त्या बॅडमिंटनही खेळायच्या . पत्ते आणि क्रिकेटची मॅच बघणे हे आवडीचे खेळ. मनोरंजनासाठी पेपर वाचन , शब्दकोडे - सुडोकू सोडवणे , चायनीज कोडे , अवांतर वैचारिक वाचन , टिव्ही , इत्यादी गोष्टी आवडायच्या .

या व्यतिरिक्त शिवण , वीणकाम , या गोष्टींवर सफाई होती . दोन सुयांवरील  वीणकामात विशेष गती होती . लोकर आणून दिल्या पासून अगदी कमी कालावधीत सेट तयार होत असे . 

माझे सासरे  जिल्हा होमगार्ड कमांडंट होते . त्या सहयोगातून होमगार्ड संघटनेतही त्यांचे योगदान होते . अलिबाग नगरपालिकेच्या त्या सदस्यही होत्या . हौशी नाटकां मधूनही  त्यांनी काम केले होते . शाळा , भजनी मंडळ , ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ भारतभ्रमण झाले होते .चारधाम , नर्मदा परिक्रमा , काशीयात्रा या विशेष पण कठीण अशा यात्रांचा योगही त्यांनी साधला होता. योग्य ठिकाणी दानधर्म करण्याची त्यांना आवड होती .

निवृत्तीनंतर विशेष करुन त्यांनी गाण्याचे क्लास , दत्तमंदिर सेवा , वीणा भजनी मंडळ यात स्वत:ला गुंतवून घेतले होते .  रोजच्या जीवनातलं त्यांचं वागण म्हणजे जणू पाण्यातलं लोणीच !  पाण्यापासून अलिप्त पण तुम्ही स्पर्श केलात तर मधुर चव मिळेल .निरलसपणे कसं जगावं , कशातही अवास्तव न गुंतता कसं  रहावं  , अविचार नाही आणि अति विचार नाही याचा त्या वस्तूपाठ होत्या .

कौटुंबिक पातळीवर नातवंडे / पणतवंडे यांच्या सहवासाने त्या समृद्ध होत्या .

ईश्वर आणि ईश्वरी योजना यावर त्यांचा गाढ विश्वास होता . गेले काही महिने श्वसनाच्या विकाराने त्यांना हैराण केले होते.  दोन महिन्यांपूर्वी माझ्याकडून कॅलेंडर घेउन आषाढी एकादशी कधी आहे ते पाहिले होते . अजून त्यांनी काय हेरलं होतं कळायला मार्ग नाही . पण दिवसेंदिवस प्रकृती खालावत होती व औषधोपचारांचा म्हणावा तसा फायदा दिसत नव्हता .

२१ ऑगस्टला माझ्याकडे मंगळागौरीचा कार्यक्रम होता . त्या आधी आठवडाभर त्यांनी मला व माझ्या मिस्टरांना २१ ता.चा कार्यक्रम पुढे ढकलावा असं सूचित केलं . त्याप्रमाणे आम्ही पूर्वनियोजित कार्यक्रमाचे स्वरुप बदलून अगदी घरगुती स्वरूपात करायच ठरवलं . पण आत्तापर्यंतच्या दुखण्यां मधे त्यांनी दाखवलेली उमेद आता कमी पडत्ये हे जाणवत होतं . नकारात्मक विचार दिसू लागले होते.

जन्मत:च घेउन आलेले 'सुधा'मृत सु ' मती ' ने आतापर्यंत अनेकांना देउन झाले होते .

 आता मोक्षाची आस लागली होती. गेल्या आठ दिवसांपासूनच त्यांनी भैरवीसाठी तानपुरा लावायला घेतला होता . आम्ही त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा निष्फळ  प्रयत्न करत होतो पण त्यांनी मनातून वेळ निश्चित करून ठेवली असावी . २१ ऑगस्टच्या मध्यरात्रीच त्यांनी भैरवी आळवायला सुरुवात केली ती २२ तारखेच्या सूर्योदयानंतर  मैफिल संपली .

कैवल्याच्या चांदण्याला आसुसलेला चकोर " चंद्र व्हा हो पांडुरंगा "  म्हणत श्रावण शु . एकादशीला कैवल्यधामाकडे  मार्गस्थ झाला .

ईश्वरेच्छा बलियेसी !!!

प्रणाम !!!

©️स्वाती लेले 
अलिबाग .
मो . 9923885500

देवाज्ञा... यशवंत देव

देवाज्ञा...

आज सकाळीच मोबाईल बघितला आणि पं . यशवंत देवांच्या दुख:द निधनाची बातमी कळली .  मन सुन्न झालं .लहानपणापासून ऐकलेल्या त्यांच्या अनेक गाण्यांनी मनात ताल धरला . सर्वच गाणी सर्वोत्तम- एकाच नाव घ्याव तर दुसऱ्यावर अन्याय होईल इतकी मधुर , गोड , श्रवणीय ! 

१ नोव्हेंबर १९२६ रोजी रायगड जिल्ह्यातील पेण गावात या देव माणसाचा जन्म झाला . ते जात्याच गुणवंत , कलावंत , विचारवंत , ज्ञानवंत आणि म्हणूनच शब्द - सुरांचे प्रत्यक्ष ' यशवंत ' ' देव ' ! 

कळत्या - नकळत्या वयाच्या उंबरठ्यावर उभं असल्यापासून आकाशवाणीच्या माध्यमातून यशवंत देवांच्या गाण्यांची ओळख होत गेली . १९७० च्या दशकात आकाशवाणीने मराठी संगीतप्रेमींना उदंड श्रवणानंद दिला - त्या पिढीची मी प्रतिनिधी ! आकाशवाणीच्या समृद्ध मराठी गीतांच्या कार्यक्रमातला ' भावसरगम ' हा असाच एक ' देवस्पर्शी ' कार्यक्रम. सुगम संगीताची मधुर धारा चोहोबाजूंनी अक्षरश: बरसत होती . गीतकार , संगीतकार , गायक /गायिका सर्वांच्याच  स्वरांचं , शब्दांच , देवांनी शब्दशः सोनं केलं . पण तरीही मंगेश  पाडगावकर ,अरुण दाते , आणि यशवंत देव या त्रिगुणात्मक त्रयीने मराठी सुगम संगीताच्या शिरपेचात  अनेक नवे तुरे खोवले . बाबूजी , आशा भोसले , लतादीदी, सुधा मल्होत्रा ,सुमन कल्याणपूर ,रविन्द्र साठे , सुरेश वाडकर ,रंजना जोगळेकर यांच्या सारखे गायक तसंच गदिमा , वसंत बापट , कुसुमाग्रज ,सुधीर मोघे ,वंदना विटणकर असे अनेक गीतकार , तसंच प्रभाकर जोग , मिलिंद जोशी  ,बाबूजींसारख्या संगीतकारांच्या विश्वात देवांच संगीत व काव्यप्रतिभा खऱ्या अर्थानं  बहरत गेली फुलत गेली . 
स्वर आले दुरुनी , जीवनात ही घडी , शुक्रतारा मंद वारा , येशील येशील राणी , कधी बहर कधी शिशिर , प्रिया आज माझी , दिल्या घेतल्या वचनांची , तुझ्या चंद्रशाळेत नेशील का रे , तुझे गीत गाण्यासाठी, या जन्मावर , अशी एका पेक्षा एक सुरेल सरस गाण्यांची त्यांनी निर्मिती केली .

यशवंत देवांनी  शब्द - सुरांना कुरवाळत ज्या रचना स्वरबद्ध केल्या त्या सरळ , साध्या ,सोप्या शब्दप्रधान होत्या . आणि म्हणूनच त्यांच्या हाती आलेली सगळी शब्द लेणी सुरांच्या धुमाऱ्यानी तेजाळली . अजिबात विसरता न येणारं '' विसरशील खास मला ' हे गीत त्याचं उत्तम उदाहरण आहे . आज पाच दशकांहून अधिक काळ त्यांची गीतं रसिकांच्या ह्रदयावर अधिराज्य करत आहेत . सुगम संगीतातल्या ' भावा ' इतकाच कुठे शोधिसी रामेश्वर  , हे आदिमा हे अंतिमा ,कोटि कोटि रुपे तुझी अशा  काही रचनांमधून त्यांचा  चिंतनशील आध्यात्मिक पिंडही दिसतो . ओशोंच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी स्वतः काही स्वतंत्र हिंदी रचना करुन त्या स्वरबद्ध केल्या .

सुरांचं साम्राज्य निर्माण करताना ' शब्द ' हा ब्रह्मस्थानी आहे या विचारधारेचे ते प्रथम उद्गाते ! या मध्यवर्ती भूमिकेवर ठाम राहूनच त्यांनी अनेक अनवट सुरावटींची निर्मिती केली . भावगीतातला भाव कटाक्षाने जपला जाईल याची कायम काळजी घेतली.  शब्दप्रधान गायकीच्या कार्यशाळेचा उगम यातूनच झाला . या माध्यमातून अनेक उभरत्या कलाकारांना या ' देवाचे ' आशीर्वाद मिळाले .

त्यांच्या लेखणीने अनेक अजरामर गीतं लिहिली तसच कृतज्ञतेच्या सरी ,रियाजाचा कानमंत्र , शब्दप्रधान गायकी , पत्नीची मुजोरी अशी काही पुस्तकेही लिहिली. पत्नीची मुजोरी मधे त्यांच्यातला मिश्किल , खट्याळ स्वभावही दिसतो . याच पुस्तकातली ' मी शिवाजी ' ही कविता कोणत्याही काळाला पूरक वाटते .

लग्नानंतर मी मुंबईहून अलिबागला आले . संसारसंगीता सोबत मनातल्या मनात इतर गाण्यां बरोबर देवगाण्यांची रुंजी चालू असे . अलिबागला त्यांचे खाजगी ,सार्वजनिक अनेक कार्यक्रम झाले . शब्दसुरांची प्रेमी म्हणून  त्या प्रत्येक कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहिले केवळ  देवदर्शनाच्या ओढीनं ! देवसरां नी सुरु केलेले सुगम संगीताचे क्लास कालौघात अलिबाग इथेही सुरु झाले . मंदार भिडे या शिष्योत्तमाने देवदूताची भूमिका बजावली व त्यांची देवगाणी आमच्यासारख्या नवशिक्यांपर्यंत पोचवली . आयुष्याच्या या टप्प्यावर देव असे गाण्यांमधून भेटण्याचा दैवी योग होता .

यशवंत देवांच संगीत म्हणजे पौर्णिमेच्या अर्ध्या रात्री उमलणारं  चंद्रविलसिनी ब्रह्मकमळच ! वाऱ्यावर डुलताना फुलणारं ते सहस्त्रदळ पाहणं , त्याचा पसरणारा मंद सुगंध अनुभवणं यातून मनाला जो ताजेपणा येतो तो ,  आनंद अवर्णनीय असतो . आज अनेकजण  या सुगंधात  परत हरवून गेले असतील .

देवांच्या शब्द सुरांच्या या अथांग सागरात कितीही डुबकी मारली तरी त्यांनी दिलेल्या अविनाशी अवीट संगीताचा अमाप ठेवा उरतोच .

गेले अनेक दिवस ते वेगवेगळ्या व्याधींशी सामना करत होते. पण या लढाईला अखेर यश यायचं नव्हतं . दोनच दिवसांनी येणारा त्यांचा वाढदिवस स्वर्गलोकात साजरा करण्याची ' त्या ' देवाची इच्छा असावी . परम ईश्वराने पं . यशवंत देवांना तशी ' देवाज्ञा ' दिली आणि ती शिरसावंद्य मानून ईहलोकावरील हा सर्वाथाने ' यशवंत ' देव आज  देवाघरी ' गेला .

ईश्वरेच्छा बलियसी ! 

प्रणाम !

©️स्वाती लेले 
अलिबाग 

माझिया मना ...होळी

हो ssss ली हो....

होळी , शिमगा आणि कोकण याच्या  अनेक रंजक गोष्टी लहानपणापासून ऐकल्या , वाचल्या होत्या पण अनुभवलेल्या नव्हत्या. तसं काही कारणही नव्हतं म्हणा ! मनात सुप्त इच्छा होती एवढीच ! इथे कोकण म्हणजे प्रामुख्याने रत्नागिरी असं समजायचं बरं का ! श्री देव भैरी बुवा , गावाच्या बारा वाड्या आणि समस्त रत्नागिरीकर यांचं एक वेगळं नातं आहे. मुंबईतला चाकरमानी सगळं काही बासनात बांधून ठेवून होळीला रत्नागिरीत हजर होणारच. माझ्या धाकट्या सुनेचं माहेर रत्नागिरीचं असल्यामुळे या वर्षी आम्हाला ही  होळी जवळून पाहण्याचा आणि तो माहोल अनुभवण्याचा योग आला. 

श्री देव भैरी व देवी जोगेश्वरी ( जुगाई ) यांची भेट हा सर्व उत्सवातला प्रमुख गाभा आहे . श्री देव भैरी बुवा हा सगळ्या गावाचं रक्षण करतो , आपल्या भक्तांच्या अडचणींचं निवारण करतो अशी सर्व ग्रामस्थांची गाढ श्रद्धा आहे. होळीच्या दिवशी रात्री बारा वाजता श्री देव भैरीची पालखी मोठ्या दिमाखात निघते. पालखी फुलं , हार यांनी सजवलेली असते.
होळीच्या दिवशी सकाळी श्री देव भैरीची मूर्ती पालखीत ठेवण्यात येते. मूर्ती सोन्याची असून  सुंदर सजवलेली असते. त्याला रूपं लावणं म्हणतात. या श्री भैरीला वेगवेगळ्या गावातून पालख्या येतात. काही भैरीच्या असतात तर काही जुगाईच्या असतात. रात्री या वेगवेगळ्या पालख्यांची वाटेत प्रेमाची भेट होते. ढोल ताशा च्या तालावर धुंद होऊन भाविक या पालख्या पुढे नेतात. भैरी व जुगाई हे पती पत्नी आहेत असा समज आहे. गावात असलेल्या जुगाईला भैरी वर्षभराने होळी पौर्णिमेला भेटायला जातो. तिथे ही पालखी २/३ तास थांबते. यावेळी भाविकांना  दर्शन घ्यायला परवानगी नसते.   पहाटे परत ही पालखी उठते व दुतर्फा उभ्य असलेल्या सुवासिनींकडून पूजा , आरती , मान घेऊन बारा वाड्यांचा मान घेऊन दुपारपर्यंत सहाणेवर जाऊन थांबते. दुसरीकडे होळीचं  प्रतिक म्हणून सुरमाड तोडण्याची तयारी चालू असते. तो तोडणे , त्यानंतर तो सर्व गावकऱ्यांनी वाहून नेणे या साठी वेगवेगळ्या ज्ञातींचे मानकरी ठरलेले आहेत. हे सर्व काम जोखमीचे असते. पण सर्व ग्रामस्थ ते प्राणपणाने व मोठ्या श्रद्धेने ते पार पाडतात. तोडलेला सुरमाड म्हणजेच होळी ठरलेल्या मार्गावरून मिरवत सहाणेवर नेऊन उभा करतात. पहाटे परत ही पालखी जुगाईच्या (जोगेश्वरीच्या)देवळातून निघून तिच्या ठरलेल्या मार्गाने ढोल ताशांच्या गजरात  मार्गात दुतर्फा पूजा आरती घेवून उभ्या असलेल्या सुवासिनींकडील मान घेवून ज्या ठिकाणी होळी असते तेथे येते.व होळी(सुरमाड)उतरे पर्यत तिथेच थांबते.सुरमाड उतरल्यानंतर(तोडल्यानंतर)तो सर्व ग्रामस्थ मिळून सहाणेपर्यंत उचलून नेतात.या होळीसोबतच पालखी सहाणेवर येवून स्थानापन्न होते.मग उचलून आणलेली सुरमाडाची होळी सहाणेसमोर उभी करतात. धुलीवंदनाच्या दिवशी पालखी सहाणेवर बसते ती रंगपंचमीच्या दिवशी ऊठून ठरलेल्या मार्गाने रंग खेळत आपल्या मंदिरात जाते.मात्र सहाणेवर उभी केलेली होळी ही गुढीपाडव्याला ढोलताशांच्या गजरात उतरवली (तोडली) जाते. इथे प्रत्यक्ष होळीचा होम हा त्या सुरमाडा शेजारी थोड्या प्रमाणात करण्याची प्रथा आहे. 

एकूणच या सणात ग्रामस्थांचा एकोपा , श्री देव भैरी वर असलेली परम श्रद्धा , आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी जीवाचं रान करायची सर्वांची तयारी दिसून येते. समस्त रत्नागिरी आणि पंचक्रोशीतील सर्व गावे शिमगामय झालेली असतात. काही गावांमध्ये श्री देव भैरीच्या पालखी बरोबर शंकासूर नाचवण्याची प्रथा आहे. होळीच्या वेळी घातलेल्या फाका हा स्थानिक संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे.

त्याच प्रमाणे दापोली , खेड ,  मंडणगड या भागात शिमग्याची सोंगे  दिसून येतात. यात शंकासूराची भूमिका महत्त्वाची असते. काळ्या कपड्यातला शंकासूर भितीदर्शक आकर्षणाचा भाग असतो. लांजा ,राजापुर रत्नागिरी येथे  खेळे खेळले जातात. एखादी पौराणिक कथा घेऊन त्यावर स्थानिक कवि काव्य करून नाट्यरूपात सादर केली जाते. स्त्री पात्रे पुरुष च रंगवतात. संस्कृतीची ही सारी रुपं  मजेशीर असतात.

तसं पाहिलं तर प्रत्येक उत्सव आपापली खासियत जपतच असतो. . पण होळीच्या पुरणपोळीच्या पुरणाचा गोडवा , आणि मऊसूतपणा हा  जेव्हा मानवी नातेसंबंध आणि संस्कृती जपण्यात उतरतो तेव्हा तो सण , सण न राहता संस्कृतीचा  मापदंड बनतो.

©️ स्वाती लेले, अलिबाग.
swatilele31@gmail.com.










नांदा सौख्यभरे .....

शुभ मंगल (अति ) सावधान......

विवाह हा खरं तर हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी एक संस्कार !  हिंदू धर्म शास्त्राप्रमाणे विवाहाचे एकूण आठ प्रकार आहेत . आज सर्वसाधारणपणे जी पध्दत प्रचलित आहे ती  त्यापैकी ब्राह्म विवाह या पध्दतीतून निर्माण झाली आहे . वेदांना अपेक्षित विवाह म्हणजे शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम स्त्री व पुरूष यांनी एकत्र येउन विशिष्ट समाजाचे , कुळाचे , संस्कारांचे वहन करणे म्हणजेच पुढे नेणे. यात सहचर्य , सहजीवन, प्रेम , त्याग ,कर्तव्य हेही अपेक्षित असल्यामुळे विवाह हा केवळ " करार " नसून नव्या सक्षम प्रजेच्या उत्पत्तीसाठी समाजमान्यता मिळालेला तो एक " संस्कार  " आहे .

असं म्हटलं जातं की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात.
पण हे झालं बाबा आदम च्या काळातलं विधान ! स्वर्ग ते पृथ्वी इतका प्रवास करताना या गाठी खिळखिळ्या होतात की काय असं वाटावं अशी सध्या परिस्थिती आहे ." विवाह " या विषयाला अनेक कंगोरे आहेत आणि सर्वच गोष्टींचा उहापोह करणे इथे शक्यही होणार नाही . त्यामुळे लग्न जमण्याच्या  प्रकीयेतील अडचणी हा या लेखाचा केंद्रबिंदू आहे .माझा वकीलीचा व्यवसाय , समाजकार्य , माझ्या स्वत:च्या तसंच नातेवाईक ,मित्रपरिवारातल्या मुलां मुलींच्या लग्नाच्या वेळचे अनुभव हे  या लेखाचे स्फूर्तिस्थान आहे . 

कोणत्याही काळात कोणत्याही प्रांतात लग्न किंवा विवाह हा मुला मुलीं इतकाच कुटुंबातल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे . असं जरी असलं तरी सध्याच्या काळात लग्न आणि त्या संबंधी अनेक गोष्टींचे आयाम बदलले आहेत . अर्थात बदलत्या सामाजिक परिस्थितीचा हा परिणाम असावा . आणि सामाजिक परिस्थिती काही एका दिवसात बदलत नाही . अनेक स्थित्यंतरांचा तो परिपाक असतो . लग्न जमणे / जमवणे ही एक प्रक्रिया आहे . पति - पत्नीचं नातं विवाहाच्या संस्काराने पक्कं होतं . साधारण ६०/७० वर्षांपूर्वी टिपण चांगलं जुळतय या निकषावर लग्न ठरत असे  . या प्रकारात मुला मुलीची पसंती दुय्यम असे .ज्येष्ठ लोक घराण्याची माहिती काढत  व त्यांच्या निकषांनुसार लग्नाची गाडी पुढे सरकत असे .३०/३५ वर्षांपूर्वी पत्रिके बरोबर मुला -  मुलीच्या फोटोचीही देवाण घेवाण होऊ लागली . पत्रिके इतकच व्यक्तीचे प्राथमिक दिसणेही महत्वाचे आहे असे वाटू लागले . थोडीफार कुटुंबाची रुपरेषा माहिती करुन घेणे व एकमेक कुटुंब एकमेकांना तोलामोलाची आहेत की नाहीत हे पहात असतानाच  गुप्तपणे कुटुंबाची माहिती काढणे,  वगैरे सुरक्षापट्ट्यांचा उपयोग करणं सुरू झालं . या सगळ्यात थोडी खेळीमेळी आणण्यासाठी " कांदेपोहे " कार्यक्रमही सुरू झाला . " कांदेपोहे " नी लग्नाच्या मार्केटमधे बऱ्यापैकी जम बसवला होता . काळाच्या ओघात आता  " कांदेपोहे " ची गाडी सीसीडी / बरिस्ताच्या स्थानकापर्यंत येउन पोचली आहे . एखाद्या ठिकाणी ते उपलब्ध नसेल तर मग एखाद निवांत रेस्टॉरंटही चालत . कांदेपोह्यात गुदमरलेल्या मुला / मुलींच्या गप्पा या नविन वातावरणात खुल्या दिलाने होऊ लागल्या . तो पर्यंत दोन्ही कडचे पालक पत्रिका जुळवून सज्ज असतात. आता त्यांना बाहेर भेटायला गेलेल्या मुलाकडून / मुलीकडून काय होरा येईल याची आस लागलेली असते . पहिल्याच भेटीत सकारात्मक चित्र दिसण्याचे भाग्य फार थोड्या कुटुंबांच्या बाबतीत दिसतं . सुरुवातीच्या काही भेटी नकारघंटा वाजवण्यात जाऊ लागल्या की दोन्ही कडची कुटुंब , आपापल्या मुला / मुलीची समजूत काढतात की इतक्या काय फटी काढायच्या , हे आधी कळत नव्हतं का ? किंवा हे सांगून मगच पत्रिका दिली होती - भेटायच्या आधी विचार करायचा वगैरे वगैरे. या आणि अशा प्रसंगांची पुनरावृत्ती व्हायला लागली व ती खूप काळ टिकून राहायला लागली की दोन्ही बाजूची उद्वीग्नता वाढायला लागते आणि आपल्यात काय कमी आहे पासून आपल्यात किती काय काय वरचढ आहे याची यादी करणं सुरू होतं . आणि इथेच frustration ला सुरूवात होते . याचं खोलात जाऊन कारण शोधलं तर मुलांचा ( इथे मुलीही अध्यारुत आहेत ) पालकांशी सुसंवाद नाही हेच दिसून येतं . बरेच वेळा पालकांचा थोडा  दबावही कारणीभूत असतो . 

लग्न जुळवण्याच्या प्रक्रियेतील अडथळे :- 

१) वय - आज काल लग्नाचे वय ३० च्या जवळपास येउन ठेपलय .३०/३५ वर्षांपूर्वी तिशीतल्या जोडप्याला निदान एक मूल झालेलं असायचं . काय गैर होतं त्यात ? सर्वसाधारणपणे दोघेही पदवीधर असायचे , ( काही कुटुंबात पालकही पदवीधर असत )दोघांचीही नोकरी किंवा एकाचा उद्योग/व्यवसाय असायचा , थोड्या मौजमजेनंतर यथावकाश मूल होत असे. आता जी पिढी ६०-६५ च्या दरम्यान आहे ती बरीचशी जबाबदारीतून मुक्त आहे . काहींनी लग्नानंतरही स्वतःचे शिक्षण पूर्ण केले अथवा वाढवले व स्वत:ला परिपक्व केलं . नविन टेक्नॉलॉजीही गरजेनुसार  शिकून घेतली.

पण आजकाल मुलगा किंवा मुलगी कोणालाही स्वखुशीने लवकर लग्न करायच नसतं  . ठराविक वयानंतर मतं जास्त ठाम होत जातात , नोकरी/व्यवसायातील आव्हानं साद घालतात, ती पुरी करताना दमछाक होते पण ती शेअर करायला आता आई वडील कमी वाटू लागतात , एकीकडे लग्न ठरत नसल्याची चिडचिड आणि मग frustration वाढीला लागतं . अरे माझ्यात सर्व चांगल्या क्वालिटीज आहेत मग माझ लग्न का ठरत नाही ? असंच प्रत्येकाला वाटत असतं . वाढतं वय हा एक प्रमुख अडथळा आहे . हे झालं स्वेच्छेने लग्न पुढे ढकललेल्या मुलांबाबत .! पण काही मुलां/मुलींचे त्यांची चूक नसताना अकारण वय वाढते उदा : मुलाला गलेलठ्ठ पगाराची नोकरी नसणे , मुलगा महानगर सोडून अन्य गावात अथवा शहरात रहात असेल , मुलावर आई वडिल किंवा अन्य जबाबदारी असेल , मुलगी एकुलती एक असेल , मुलीच्या नोकरीच्या शिफ्ट डुट्या असतील , मुलीवर काही जबाबदारी असेल तर त्यांची लग्न ठरण्यातही अडचणी येतात .
वयातलं अंतरही खूप कमी म्हणजे दोघे बरोबरीचे हवे असतात .

२) उत्पन्न  -  बाकी सगळ्या बाबतीत समानतेचे वारे वहात असताना मुलीना मुलाचा पगार मात्र आपल्यापेक्षा जास्त हवा असतो . पण मग वयात अंतर अगदी कमी हवे . दोघेही जर बरोबरीचेच असतील आणि शिक्षण पण समान पध्दतीचं असेल तर मुलाला वरचढ पगार कसा असेल .? त्याच प्रमाणे मुलगीही शक्यतो वरचढ पगाराची नको असते .

३५/४० वर्षांपूर्वी अशी किती तरी जोडपी मी पाहिल्येत ( आमची वरची पिढी )की पत्नीचं शिक्षण किंवा कमाई पतीपेक्षा लौकिकार्थाने वरचढ असे . पण त्यांच्या संसारात या गोष्टीमुळे काही वादंग झाला असं फारसं कधी ऐकिवात नाही . हां !  नियमाला अपवाद असतोच .

३) रहाण्याचं ठिकाण ( अर्थात मुलाचं  ): मुलाचं रहातं ठिकाण हा आजकाल खूप महत्वाचा मुद्दा ठरत चालला आहे . मोठ्या शहरांचा विचार केला तर मुलींच्या नोकरी व माहेरच ठिकाण या भोवती विचाराची सुई फिरते . निमशहरं किंवा गावांच्या ठिकाणी तर परिस्थिती अजूनच बिकट आहे कारण तिथे शहरीकरणाचा वारा पोचलेला नसतो . शहरातलं पोशाखी नोकझोकवालं वातावरण नसतं . एरवी वीकएन्ड साठी आवडणाऱ्या destinations ना अशावेळी फुल्ली मारली जाते . काहीवेळा मुलींच व तिच्या पालकांच बरोबरही असतं . तिचं शिक्षण , तिची नोकरी जर तेवढ्याच जबाबदारीची ( Hi profile )असेल तर तिच्या भविष्याकरता तिने लग्नानंतरही मोठ्या शहरात रहाणंच केव्हाही योग्य ! पण दर वेळीच अशी परिस्थिती नसते .मध्यम किंवा निमशहरां मधे तुलनेने स्वास्थ्य, रहाणीमानाचा दर्जा , सुरक्षित वातावरण जास्त चांगलं असतं .काही मुलींची प्रोफाइल सर्वसाधारण असते( अशी  की ज्यांच शिक्षण, नोकरी विचारात घेता त्या  कुठेही adjust होऊ शकतील )अशावेळी पालकांनी दुरदृष्टीने  मुलीना समजवण्याची व आपण कुठे आहोत या बाबत आत्मनिरिक्षण करण्याची गरज  आहे असं वाटतं . अस झाल तर लग्न ठरण्यातला विलंब कमी होईल. व योग्य वयात संसाराची गाडी सुरू होईल.

४) छंद, आवडी निवडी , विभक्त / एकत्र कुटुंब , कपडे वापरायच्या पध्दती , स्वत:ची स्पेस वगैरे - या प्रकाराबाबत मुलगे फार आग्रही असतात अस दिसत नाही. अगदीच वेगळ्या पध्दतीचं करिअर असेल तरच ते आग्रही असतात कारण त्या करिअरला सपोर्ट करणारी मुलगी असेल तर सहजीवन नक्कीच आनंदी होतं . मुलांना शक्यतो आई वडिलांसोबत रहाण्याची इच्छा असते . नविन मुली बरोबर संसार सुरू करताना एक माध्यम म्हणून किंवा मॉरल सपोर्ट म्हणून त्यांना ती मानसिक गरज वाटत असावी. काळाप्रमाणे, बदलत्या परिस्थितीनुसार मुलगे ही विभक्त रहायला तयार होतात . थोडी वाट पहायची तयारी हवी . आजकाल सुनांनी आधुनिक कपडे घालायला सासरच्या लोकांची सहसा ना नसते . प्रश्न असतो आपल्याला काय शोभतं आणि वेळप्रसंगी काय उचित दिसेल  याचं भान त्यांनी राखणं गरजेच आहे . 

५) स्वत:चं घर : साधारण १९८०-९० च्या दशकापर्यंत वडिलांच स्वत:चं घर असण हे उत्तम रहाणीमानाच लक्षण  समजलं जायचं . आपली मुलगी तिथेच रहाणार आहे हे ही त्यात गृहीत असायचं . आज काल जर अरेंज मॅरेज असेल तर दाखवायच्या दिवशीच मुलीचे आईवडिल विचारतात हे घर वडिलांच्या नावावर आहे की अन्य कोणाच्या ? किंवा मुलाचं स्वत:चं घर आहे /फ्लॅट आहे का ? मुलाला भाऊ असतील तर ते सर्व एकत्र रहाणार का त्यांची  वेगळी काही  सोय आहे ? २८ ते ३०/३२ वयाच्या मुलाकडून जो कधी कधी मुली इतक्याच वयाचा व थोडफार तिच्या इतकाच कमावणारा असतो त्याच day one ला स्वत:च घर असण्याची अपेक्षा आपण कोणत्या गृहितकावर करतो ? आणि स्वताच घर असेलच तर मग ते लोनच्याच जोरावर घेण्याची शक्यता जास्त.  म्हणजे लग्न झाल्यापासून आपली मुलगी कर्जाच्या छायेत जाईल हा व्यावहारिक विचार आजकाल होताना दिसत नाही. मुलाच घर /फ्लॅट ,गाडी , मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी , गलेलठ्ठ पगार हेच लग्नाच्या बाजारतलं आजच्या आदर्श लग्नाळु मुलाच चित्र आहे. बाकीचे प्रोफाईल हे लो प्रोफाईल समजण्याचा प्रघात बळावत चाललाय .

६) जबाबदारीच्या जाणीवेचा अभाव : आजकाल सर्वचजण मॅट्रिमोनी साईट्स वर मुला/मुलीचे प्रोफाइल अपलोड करतात . प्रोफाइल बघितल्यावर समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधल्यावर योग्य वेळेत उत्तर देउन समोरच्याला मोकळं करणे कोणालाही महत्वाच वाटेनासं झालय . ही तक्रार दोन्ही कडची मंडळी करताना दिसतात. हे कशाचं द्योतक आहे ? जबाबदारीचा विसर पालक व पाल्य दोघांनाही पडतोय हेच यातून दिसतं .

७) सुसंवादाचा अभाव : जेव्हा मुलगा व मुलगी हॉटेलमधे भेटतात त्यावेळी दोघांपैकी कोणीतरी एक पालक किंवा नातेवाईकांच्या रेट्याला घाबरून किंवा योग्य संवादाचा अभाव असलेल्यामुळे मुलांच्या मनातल्या काही गोष्टी पालकांना माहिती नसताना भेट घडवून आणली जाते व त्यावेळी दोघांच्या प्रत्यक्ष भेटीत अशा काही गोष्टींचा उलगडा होतो की गाडी पुढे नेणं शक्यच नसतं . अशावेळी दोघांचाही वेळ , हॉटेलच बिल वाया , व निष्पन्न काही नाही अशी वेळ येते . अशा वेळा सुसंवादाने टाळता येउ शकतात.

ह्या आणि अशा अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे लग्न ठरण्याची प्रक्रिया सध्या लांबत चालली आहे . सगळ्याच गोष्टी सुरुवातीपासून चित्रातल्या चौकटीत बसवल्या सारख्या मिळत नाहीत हे पालकांनी व मुलां/मुलींनी समजून घ्यायला हवं . लौकिक सुखाची चौकट परिपूर्ण असावी ही इच्छा रास्त असली तरी वाट पहाण्याची समंजस सबूरीही हवी हे दोन्ही  पालक व मुला/मुलींनी विसरून चालणार नाही . " हे लग्नाच्या आधीच सांगितल होतं मग आता असं  कसं  म्हणता ? तेव्हा तुम्ही अस अस म्हणला होतात वगैरे वगैरे .... " असा कडक करारातला सूर लावणं  योग्य नाही . यामुळे नात्याची वीण घट्ट होण्याऐवजी सैलावते व त्यामुळेच कुटुंबसंस्था धोक्यात येते . कोणत्याही गोष्टीची खात्री ही आधी करुन मगच पुढे जाणं केव्हाही योग्य .

माझ्या वकिली व्यवसायात गेल्या २८ वर्षात कौटुंबिक केसेसचे अनेक वेगवेगळे नमुने बघायला मिळाले . काही ठिकाणी खरोखरच अन्याय झालेला असतो तर काही ठिकाणी अन्यायाचा बेमालूम आभास तयार केलेला असतो .
कुटुंबसंस्थेशी  निगडीत बरेच कायदे सध्या महिलांच्या बाजूने आहेत.  त्यांच्यासाठी ते सध्या दुधारी शस्त्र ठरतय . लग्न करायच ,जरा काही पटल नाही की नवऱ्यावर कोर्टात केस घालायची की कोणत्या ना कोणत्या कायद्याखाली पोटगी लागू होतेच . नवऱ्याला हे टाळायच असेल तर उगती पोटगी देणे हाच पर्याय उरतो  . कुठूनही नवऱ्याच्या खिशाला भगदाड आहेच .

व्यवसायाचा भाग म्हणून आणि कुटुंबसंस्था टिकायला हवी यावर विश्वास असल्याने मी समुपदेशनही करते . १५/२० वर्षापूर्वी नवरा बायकोच्या भांडणांमधे साधारणपणे ६० ते ७० % तडजोडी खूप प्रयत्नांअंती का होईना यशस्वी होत असत . कितीतरी टोकाच्या भूमिकांमधेही मी यशस्वी तडजोडी करुन संसार नांदते करुन दिले आहेत . पण गेल्या ५/७ वर्षात तडजोड करणे , १/२ पावलं दोघांनीही मागे येणे , वेगळ्या पर्यायांचा विचार करणे हे होत नाही . दोघेही आपापले पक्के विचार घेउन आलेले असतात व त्यात त्यांना जराही बदल करायची इच्छा नसते . आपण तडजोड घडवून आणायला कमी पडलो या पेक्षा त्यांना सहजीवन , साहचर्य , एकमेकांसाठी सोसणं , काही गोष्टींचा त्याग करणं , काही सोडून देणं या भावना कळत नाहीत किंबहुना त्या कळून घ्यायची इच्छाही नाही याचं दु:ख होतं . संसार हा उभयतांच्या राग , लोभ, प्रेम , त्याग , समंजसपणा , यावर चालतो ५/१० अटींच्या करारावर नाही चालत हे या मंडळीना समजावायला हवं . अति चिकित्सा , काटेकोरपणा ,सावधानता कधी कधी घातक ठरू शकते . आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगाना तोंड देण्याचं सामर्थ्य आपण आपल्या पाल्याला दिलय याबाबत पालकांना विश्वास हवा . मुलींच्या बाबतीत मुलगा बघताना ज्या फूटपट्ट्या असतात त्या त्यांचा मुलगा लग्नाच्या बाजारात उतरतो तेव्हा बदललेल्या असतात. हे ही योग्य नाही . 

अर्थात नियमाला अपवादही असतात. पण त्यांच प्रमाण अगदी नगण्य आहे . काही लोक अर्थात दोन्हीकडचे खूपच मृदू , प्रॅक्टिकल विचारांचे, ऋजू मानसिकतेचेआणि समंजस  असतात. 

शिक्षणाच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे पण त्याबरोबर पालकांमधल व लग्नाच्या मुला / मुलींमधल्या सजगतेचं  , समंजसपणाचं, स्वत:चा आवाका , कुवत ओळखण्याचं ,सुखाचे मापदंड डोळसपणे बघण्याचं, प्रमाणही वाढायला हवं ,  तरच लग्न जमवणं हा केवळ  एक उपचार न रहाता ( म्हणजे ठरलं बाबा एकदाचं ही भावना न रहाता ) भावी पती पत्नी साठी संस्कारक्षम " विवाह " ठरेल .
आणि घटस्फोटांचं वाढतं प्रमाण आटोक्यात येईल व कुटुंबसंस्था अबाधित राहिल .

ॲड . स्वाती लेले ,
अलिबाग - रायगड 
swatilele31@gmail.com

हा लेख पुणे प्रतिष्ठान च्या २०१८ च्या "  शुभलग्न विशेषांक " या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता.







माझिया मना ...वाचन प्रवास

माझा वाचन प्रवास .....

 साधारण आपल्याला वाचता येतंय हे कळायला लागल्या पासून काही ना काही मी वाचत असायची. लहान वयातले कुमार, चांदोबा, फुलबाग, जादूचे अमूक तमूक , प्राण्यांच्या गोष्टी असे कितीतरी प्रकार पटकन  वाचून होत असत. ( ज्योत्स्ना प्रकाशन ची पुस्तकं छान असत.) हे बघून माझ्या वडिलांनी त्यांच्या बरोबरच  दादर च्या सुप्रसिद्ध मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात बालविभागाची रितसर मेंबरशिपच घेऊन दिली. मग काय दर आठ दिवसांनी आपल्या आवडीची पुस्तकं वाचायला मिळायला लागली. वाचन आणि त्याच्यामुळे मनात काही प्रतिमा तयार होणं हे ज्या पुस्तकामुळे पहिल्यांदा घडलं ते म्हणजे " श्यामची आई ". हे पुस्तक त्या वयात किती वेळा वाचलं असेल त्याला काही गणतीच नाही. आईचं प्रेम , संस्कार , साधं सुधं कोकण, कष्टमय जीवन,  काही बाही मनावर कोरलं गेलं हे खरं. मोठ्या वयात आता फिरण्याच्या निमित्ताने लाडघरला गेल्यावर लाडघरचं तामसतीर्थ पटकन आठवतं. असो.

कुमार, किशोर,चंपक, ठणठणपाळ, गोट्या, बोक्या सातबंडे अशा अनेक घटकांनी त्या त्या वयातली वाचन भूक भागवली आणि वाढवलीही. आता पर्यंत लायब्ररीत जाऊन पुस्तक बदलून आणण्याची गोडी व सवय लागली होती. फक्त आता गाडी कुमार विभागात गेली होती. लायब्ररीत जाणे हा माझ्यासाठी आजही  एक परम सुखानुभव असतो. याची बीजं बहुतेक लहानपणच्या त्या लायब्ररीतल्या विश्वात रुजली गेली असावीत. इतकी की अलिकडेच मी अमेरिकेला गेले असताना एका सार्वजनिक लायब्ररीला भेट देऊन तिथे मनसोक्त वेळ घालवला. 

कॉलेजच्या त्या रंगीबेरंगी दिवसांत कथा, कादंबरी, चरित्र याबरोबरच कविता भेटली आणि मग ती सहप्रवासीच झाली.
आता पर्यंत पु.ल., व.पुं ची पारायणे, द.मा. , शंकर पाटील , व्यंकटेश माडगूळकर, जयवंत दळवी, ना.सी.फडके, खांडेकर, शिरवाडकर , वसंत बापट, रणजित देसाई , शिवाजी सावंत,  विं.दा. ,पाडगावकर , कुसुमाग्रज, शांताबाई, महानोर अशा अनेक अनेक  मंडळींची ओळख झाली होती. गदिमा हे अजून एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. " गदिमां नी म्हटलंय त्याप्रमाणे " असं म्हणून एखाद्या ओळीने शाळेतल्या  माझ्या अनेक निबंधांचा शेवट व्हायचा. कॉलेज मध्ये भाषा विषय घेतला आणि वाचनाला थोडं वळण लागलं. मराठी बरोबर हिंदी , इंग्रजी भाषा पण जवळून अनुभवता आल्या. भाषेचं सौंदर्य समजू लागलं.  नुसतं मन रमविण्यापेक्षा अभ्यासक दृष्टीकोनातून वाचन करायची जाणीवपूर्वक सवय लागली. गूढकथा , खगोल , इतिहास , डिटेक्टिव्ह यात कधी माझं मन रमलं नाही. वर्तमानपत्र ही मोठ्या लोकांची वाचन मक्तेदारी असं मला वाटायचं. मला फक्त जाहिरातींच्या पानात रस असे. 

दिवाळी अंक हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यावेळी घरी मासिकही येत असत. महिलांच्यासाठी ललना , माहेर , वसुधा अशी काही तरी असत, या शिवाय मार्मिक , जत्रा , मोहिनी ,   अशी नर्म विनोदी मासिकं ही असत. आता लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, अनुभव , वयम् ही काही वाचनीय साप्ताहिकं / मासिकं आहेत.

लग्न होऊन सासरी आल्यावर खरी कसरत होती. घरातील सर्व माणसं कामावर जाणारी. मला एकटीला घर खायला उठे. पण सुदैवाने माझ्या आजे सासऱ्यांचं मराठी / इंग्रजी   पुस्तकांचं कलेक्शन खूप होतं.  विषय रुचणारे नव्हते. पण वाचनीय होते. लो. टिळक , गांधी विचार दर्शन , विवेकानंद , विनोबा , काही नाटके , वगैरे वगैरे. पण वेळ घालवण्याचा तो एकमेव व चांगला पर्याय होता. या वाचनाने विचारांची दिशा बदलू लागली. मग कालांतराने मी सार्वजनिक वाचनालयात जाऊ लागले. वकीलीच्या निमित्ताने कायद्याची क्लिष्ट पुस्तकं व भाषा अभ्यासता येते. तिथे ही  नेटवर केस लॉ शोधण्यापेक्षा पुस्तकातून वाचून शोधायला मला जास्त आवडतं. 

पुस्तक हे मला मित्रासारख वाटतं. त्याने सतत आपल्या सोबत असावं. त्यामुळे माझ्या पर्स मध्ये आणि हल्ली गाडी मध्ये एक - एक पुस्तक असतंच असतं. पुस्तकाला नेटवर्क वगैरे ची गरज भासत नाही. अडचणी च्या वेळी, ट्रॅफिक मधे, आपण एकटे असतो त्या प्रत्येक वेळी पुस्तक आपल्याला सोबत करतं. आणि आपण समृद्ध होत असतो ते वेगळेच.
पुस्तक वाचनात पुस्तक छान पणे सांभाळणे हा पण एक भाग येतो. मला स्वत:ला पुस्तक प्रेमाने,  नेटकेपणाने हाताळायला आवडतं. ( अगदी पेपर सुद्धा )

आता इतर जबाबदाऱ्यांमुळे अवांतर वाचायला वेळ कमी मिळतो. रुखरख वाटते. पण आता घरच्या अनेक पुस्तकांना न्याय द्यायचं ठरवलंय. पाहूया .

त्यामुळे वाचाल तर वाचाल यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
 माझ्या साठी  वाचन हा दीर्घ प्रवास आहे. तो ( मला वाचता येतंय तो पर्यंत ) शेवटपर्यंत  चालूच राहणार आहे.

©️ ॲड. स्वाती लेले, अलिबाग